कथा ह्या वर्षीच्या, वर्षा ऋतु तली । सांगतो कथा ऐका लक्ष देऊनी ॥
नभी ढग दोन मदमस्त हत्ती । राखून ते होते आपुलीच मस्ती ॥
आपुल्या जगात ते मस्तीत होते । विहरत विहरत जात होते ॥
म्हणे एक त्यात मीच आहे मोठा । दुसरा कबूल नाही, मी का छोटा ? ॥
होते अजून ढग विखुरलेले । सगळेच तयांना विसरलेले ॥
जवळची दोघे अकस्मात आले । व्हावयाचे तेच आकाशी घडले ॥
सगळे कडून काजळून आले । दिसेना कोण आहेत आपुले ॥
घर्षण होताच आवाज जाहला । कडकडाट , लखलखाट झाला ॥
तांडव नृत्य अन थयथयाट । पृथ्वी वर हाहा:कार घबराट ॥
सपाटून वृष्टी, सगळेच कष्टी । न्हाऊनच निघाली संपूर्ण सॄष्टी ॥
दृष्टी पुढे सर्व अंधारून आले । नभीचे जलकुंभ रिते जहाले ॥
कोणी म्हणाले वादळ रे शमले । कालांतराने नभ निरभ्र झाले ॥
जल रूपे अवतरले ग धरित्री । झरझर सरिता वाहू लागली ॥
अन
मिळाला त्यातच एक अभियंता । मानितसे सर्वथा मनी महत्ता ॥
घालूनि बांध अडविला प्रवाह । दुभंगून गेला सगळा प्रवाह ॥
जनात त्याची होय वाह वाह ॥ हळहळले कोणी कथीले हाय ॥
दुसरी दिशा मिळाली प्रवाहाला । वेगळाले लागले वहावयाला ॥
कौतुक करी कोणी नव्या दिशांचे । पाप ते होतेच ना ताटातूटीचे ॥
वाहते जल हे उतारा कडेच । पारित वळणे उडया घेउनच ॥
किती अडथळे असुंदे तयांला । माहीत आहेच समस्त जलाला ॥
पुढे वाट एकच आहे तयांची । कालांतराने भेट होईल त्यांची ॥
विसावा पुढे नजीक घ्यावयाचा । संगम अटळ तळ रे सागराचा ॥
मार्ग अनेक पोहोचण्या साठी । मुक्काम एकच पायी जगजेठी ॥
सुरेश पेठे
१७ सप्टेंबर २००८